
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर लिखित भारतीय संविधानाची प्रामाणिकपणे आणि प्रभावीरीत्या अंमलबजावणी झाली असती तर देशाचे सुजलाम् सुफलामचे स्वप्न केव्हाच साकार झाले असते. मात्र, प्रतिगामी शक्तींद्वारे घटनात्मक मूल्यांशी चाणाक्षपणे छेडछाड करण्याचा खेळ खेळला जात आहे, असे मत प्राचार्य जयमंगल धनराज यांनी मांडले.
पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित नागसेन मिलिंद व्याख्यानमालेचे पुष्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा (मुंबई)चे प्राचार्य अॅड. जयमंगल धनराज यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी उपायुक्त रवींद्र जोगदंड हे होते. व्यासपीठावर भिक्खू करुणानंद महाथेरो, भिक्खू धम्मपाल यांची प्रमुख उपस्थिती होती. भिक्खू करुणानंद महाथेरो यांनी ही व्याख्यानमाला पुढील वर्षी प्रा. प्रदीप रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागसेनवनच्या खुल्या मैदानात घेण्याचे जाहीर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis