
नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने प्रचंड मोठे नुकसान केले.
हुंडातांडा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. यावेळी वीज पडून शेतात बांधलेले दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली. नांदेड शहरासह देगाव भागातही पावसाने हजेरी लावली.
विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाला सुरुवात झाली. पांडुरंग सांगू राठोड या शेतकऱ्याचे बैल गावापासून अर्धा
किमी अंतरावरील शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधले होते. यावेळी विजेचा कडकडाट होऊन वीज बैलांच्या अंगावर पडली. त्याक्षणी तडफडून दोन्ही बैल जागीच ठार झाले.
लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने अर्धे झाड जळून गेले. सरपंच अनिता रोहिदास राठोड यांनी तलाठी तसेच तहसील कार्यालयाला ही माहिती कळविली. नायगाव तालुक्यातील देगावसह परिसरात शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यात २२ एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis