छ. संभाजीनगर - एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क
-जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)‘भारतीय हवामान विभागाने 2026 वर्षासाठी ‘एल-निनो’ परिस्थितीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुसंवर्धन विभागाने सज्जता वाढवली असून, जनावरांच्या चाऱ्य
छ. संभाजीनगर - एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क


-जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)‘भारतीय हवामान विभागाने 2026 वर्षासाठी ‘एल-निनो’ परिस्थितीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुसंवर्धन विभागाने सज्जता वाढवली असून, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी सर्व जिल्ह्यांना ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा आराखडा तातडीने तयार करून अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील एकूण पशुधनापैकी सुमारे 43.5 टक्के जनावरे सुका चारा आणि 25.92 टक्के हिरव्या चाऱ्यावर अवलंबून आहेत. ‘एल-निनो’ मुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनांना चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात गावपातळीवर चारा बँक उभारणी, शेतकऱ्यांना कमी पाण्यात होणाऱ्या चारा पिकांकडे वळवणे, तसेच चारा साठवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. टंचाई भासल्यास तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

यासोबतच जनावरांच्या आरोग्य व पोषणासाठी पूरक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय सेवा बळकट करणे, रोगनियंत्रण मोहिमा, तसेच पशुखाद्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित चारा लागवड आणि “टोटल मिक्स्ड रेशन (TMR)” सारख्या पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखड्याचे मुद्दे :

• पडणाऱ्या पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पर्यायी चारा पिकांचे नियोजन.

• टंचाई भासल्यास त्वरित चारा छावण्या सुरू करण्यासाठी पूर्वतयारी.

• जनावरांसाठी आवश्यक पोषणमूल्यांचा साठा सुनिश्चित करणे.

• स्थानिक पातळीवर चारा साठवणूक व वितरण यंत्रणा सक्षम करणे.

पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात ‘एल-निनो’चा संभाव्य परिणाम लक्षात घेता, चारा टंचाई टाळण्यासाठी विभागाने सर्वंकष नियोजन सुरू केले असून, पशुधन संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande