
सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)।
: जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग हा ग्रामीण भागातील लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, या योजनांचा लाभ गरीब, गरजू, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभाग सातत्याने कार्यरत राहील, असे प्रतिपादन समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी केले.
जिल्हा परिषदेतल्या शिवरत्न सभागृहात आयोजित समाजकल्याण समितीच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया गायकवाड, सौ. सिंधुताई आलदर, सौ. करुणा शिवशरण, सौ. सविता उंबरजे, कु. श्रुती भोरगुंडे, सौ. तेजस्वीनी बोराडे, सौ. शिवानी स्वामी, प्रशांत पाटील, नंदकुमार वाघमारे, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्यासह विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी उपस्थित सर्व सदस्यांचा सभापती सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती, अनुसूचित वस्तीगृह, जिल्हा परिषद सेस अंतर्गत योजना, वृद्धाश्रम तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासंबंधी विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत सखोल चर्चा झाली.
समता सप्ताहाचे जिल्हास्तरावर नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल सभापती सातपुते यांनी समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, अधीक्षक सचिन सोनकांबळे तसेच इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी विषयपत्रिकेवरील मुद्द्यांचा सविस्तर आढावा मांडला, तर विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे व स्वाती गायकवाड यांनी योजनानिहाय माहिती सादर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड