
रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष गुरुवर्य सुभाष लाड गौरवग्रंथ समितीतर्फे श्री. लाड यांच्या ६५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा येथे शनिवारी, दि. २ मे रोजी त्यांच्याविषयीचा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, माझी मायभूमी प्रतिष्ठान आणि राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे लांजा-जावडे रस्त्यावरील गणेश मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणात निःस्वार्थीपणे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात श्री. लाड यांनी ठसा उमटविला आहे. तो शब्दांकित करून गौरव ग्रंथांच्या रूपात प्रकाशित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नीलेश खरे (संपादक साम टीव्ही), मिलिंद भागवत (संपादक एनडी टीव्ही), अभिनेत नारायण जाधव आणि पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत.
मुंबईचे नगरसेवक चंदन शर्मा, पद्मश्री धाकल्या धिंडा, पद्मश्री परशुराम गंगावणे, संघाचे लांजा शाखाध्यक्ष किरण बेर्डे, राजापूर शाखाध्यक्ष एम. आर. पाटील, लांज्याच्या नगराध्यक्षा सौ. सावली सुनील कुरूप, गणपत शिर्के, जयराज मांडवकर, प्रमोद पवार, किशोर भाई नारकर, जयवंतभाऊ शेट्ये, रमेश काटकर हेही उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी साडेचार वाजता श्री. लाड यांची मिरवणूक निघेल. सव्वापाच वाजता भैरवी जाधव याचा संगीत कार्यक्रम होईल. त्यानंतर साडेसहा वाजता मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होईल. समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन गौरवांकाचे संपादक विजयराज बोधनकर, सहसंपादक महेंद्र साळवी, विजय हटकर, गणेश चव्हाण यांनी केले आहे. समारंभाला पुष्पगुच्छांच्या ऐवजी उत्तम पुस्तके आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी