
छत्रपती संभाजीनगर, 05 एप्रिल (हिं.स.)।
उन्हाळी
सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून दररोज ३१ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे, नाशिक आणि मुंबई मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे दररोज एसटीबसच्या ८९ अतिरिक्त फेऱ्या होणार असून सुमारे १३ हजार किमीचा प्रवास वाढणार आहे, सध्या शहरातून ५४६ बसेस धावत असून जादा बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
उन्हाळी सुट्टयांमुळे नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच 'वेटिंग'वर गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने 'नांदेड - हजरत निजामुद्दीन (दिल्ली)' दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड-हजरत निजामुद्दीन (०७६२१) ही विशेष रेल्वे ११ एप्रिल ते ३० मे दरम्यान दर शनिवारी सकाळी ८:४५ वाजता नांदेडहून सुटेल. ही गाडी छत्रपती संभाजीनगरला दुपारी १२:५५ वाजता येईल. परतीच्या प्रवासात (०७६२२) हजरत निजामुद्दीन येथून १२ एप्रिल ते ३१ मे या काळात दर रविवारी रात्री ९:४० वाजता सुटेल. या रेल्वेला एसी, स्लीपर आणि जनरल डबे असतील. ही गाडी पूर्णा, परभणी, जालना, मनमाड, भुसावळ, भोपाळ आणि झाशी या प्रमुख स्थानकांवर थांबेल.
या विशेष रेल्वेचे आरक्षण ५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होत आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis