
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। उदगीरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार उदगीरकरांनी व्यक्त केला आहे. यासाठी शासकीय विश्रामगृह येथे उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने तातडीची बैठक पार पडली. या बैठकीस विविध क्षेत्रातील शंभरहून अधिक नागरिक, पदाधिकारी, पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा, बैठका व निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला गती देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सोशल मीडियावरील एका संदेशावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने या मागणीला व्यापक जनसमर्थन असल्याचे दिसून आले. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करत टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी ६ एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ते निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस निमंत्रक सुरेश पाटील नेत्रगावकर, सचिव मोतीलाल डोईजोडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis