
पुणे, 05 एप्रिल (हिं.स.)।
गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामानाच्या स्थितीत बदल झाला आहे.
परिणामी किमान तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले असून, कमाल तापमान स्थिर आहे. तर पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक पातळीवर वाढलेल्या उष्णतेमुळे ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे शहरात गेल्या २४ तासांपासून अंशतः ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
शहरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके, तर किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु