
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना सध्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये काही कीटकनाशक कंपन्या आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना चुकीची किंवा भेसळयुक्त औषधे दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरुन येत्या गुरुवारी कृषि आयुक्तालयात दुपारी 12 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी, आंबा बागायतदार शेतकरी आणि संबंधित कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी बोलविली आहे.
शेट्टी यांनी आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीच्या प्रश्नांवर आवाज उठविला आहे. तसेच कीटकनाशक कंपन्यांकडून चुकीची कीटकनाशके व औषधे पुरविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून संबंधित औषध कंपन्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी आणि तक्रार शेट्टी यांनी दिनांक 4 एप्रिल रोजी कृषी विभागाकडे केली होती. त्यानुसारच ही संयुक्त बैठक बोरकर यांनी आयोजित करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु