मुंबई, नवी मुंबई मनपाच्या जलतरण तलावांतील सुरक्षेबाबत लक्ष देणे अत्यावश्यक - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) : मुंबई तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक जलतरण तलावांमध्ये सुरक्षेबाबत काही त्रुटी आढळून येत असल्याकडे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) : मुंबई तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक जलतरण तलावांमध्ये सुरक्षेबाबत काही त्रुटी आढळून येत असल्याकडे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बाबीकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, काही जलतरण तलावांवर प्रशिक्षित जीवरक्षकांची कमतरता, सीसीटीव्ही यंत्रणेचे अपूर्ण कार्यान्वयन तसेच आवश्यक सुरक्षा उपकरणांची अनुपलब्धता दिसून येते. ‘स्विमिंग आपल्या जोखमीवर’ असे फलक लावले जात असले तरी, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सन २०१० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेचा संदर्भ देत, शासनाने ‘महाराष्ट्र ॲमेच्युअर स्विमिंग असोसिएशन’च्या माध्यमातून प्रशिक्षित जीवरक्षक तयार करण्याबाबत केलेल्या सूचनेची त्यांनी आठवण करून दिली. तसेच, ३ नोव्हेंबर २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार सर्व तलावांवर प्रमाणित जीवरक्षक नेमणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात काही उपाययोजनांकडे लक्ष वेधले आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये तलावाच्या आकारानुसार किमान दोन ते चार प्रशिक्षित जीवरक्षक नियुक्त करणे, त्यांना सीपीआर (कृत्रिम श्वसन), प्रथमोपचार तसेच ‘स्पाइनल बोर्ड’ वापरण्याचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या प्रमाणपत्रांची नियमित पुनर्तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, लाईफ बुओय (लाईफ रिंग्स), रेस्क्यू ट्यूब्स, AED (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर), ऑक्सिजन सिलेंडर व प्रथमोपचार पेटी यांसारखी जीवनरक्षक साधने उपलब्ध ठेवण्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

याशिवाय, तलावातील पाण्याचा दर्जा व दृश्यमानता निश्चित मानकांनुसार राखणे, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना देण्यासाठी सार्वजनिक ध्वनिक्षेपक प्रणाली कार्यरत ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकांना विशेष तपासणी पथक नेमून सर्व जलतरण तलावांची पाहणी करण्याचे सुचविले असून, केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याबाबतही निर्देश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande