
* अमेरिकेन ट्रेड डील विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे न्याय सत्याग्रह आंदोलन
मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) - केंद्र सरकारने अमेरिकेबरोबर व्यापार करार करून भारताचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. हा व्यापार करार भारतातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करणारा आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार नाही. पंतप्रधानांनी अमेरिकेबरोबर करार करून जनतेला वेठीस धरले आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.
भारत-अमेरिका व्यापारी कराराविरोधात मुंबई युवक काँग्रेसने प्रेस क्लब जवळील मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे न्याय सत्याग्रह आंदोलन केले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार अमिन पटेल, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या पुढे म्हणाल्या की, अमेरिकेने लावलेल्या टेरीफ मुळे असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना या करारामुळे त्यांना आणखी नुकसान सोसावे लागणार आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भरीव मदत करत नाही. अर्थसंकल्पातूनही शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. इराण अमेरिका युद्धाचे भारताला चटके बसू लागले आहेत. इंधन व गॅसच्या टंचाईमुळे सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. मुंबईतील छोटे छोटे हॉटेल्स, व व्यावसायीकांना गॅस मिळत नसल्याने व्यवसाय बंद करावे लागत आहेत. घरगुती गॅसही मिळत नाही...काळा बाजार वाढला आहे. इतर राज्यातून मुंबईत कामासाठी आलेल्यांचेही गॅस नसल्याने प्रचंड हाल होत आहेत. गॅस बरोबर पाण्याची टंचाई आहे पण पंतप्रधान मोदी मात्र जनतेच्या या विषयांवर काहीच बोलत नाहीत असेही खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यावेळी बोलताना म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होण्याऐवजी अधोगती सुरु आहे. देशातून सिलेंडर गायब झाले आहेत. पंतप्रधान अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. देशाचे परराष्ट्र धोरण सपशेल अपयशी ठरले आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस सत्याग्रहाच्या माध्यमातून आवाज उटवणार आहे. केंद्र सरकारने तात्काळ ट्रेड डील रद्द करून शेतक-यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे असे शबरीन म्हणाल्या.
मुंबई युवक काँग्रेसचा सत्याग्रह मंगळवारी ही सुरु राहणार असून काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार मधु चव्हाण व अशोक भाऊ जाधव मंगळवारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी