

- ६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू
ठाणे, 06 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनाने यासाठी कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दि. ६ एप्रिल २०२७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातून जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केले जात आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणकापर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रशिक्षणासाठी ३२-३२ जणांच्या दोन स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण ६४ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केले जात आहे. हे प्रशिक्षण ११ एप्रिल २०२७ पर्यंत चालणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे तहसिलदार (अकृषिक) विनोद भामरे आणि तहसिलदार (सं.गा.यो मनपा क्षेत्र) स्वाती घोंगडे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत.
या प्रशिक्षणात प्रामुख्याने जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा असलेल्या घरयादी व घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डिजिटल स्वरूपामुळे यावेळी प्रगणकांना कागदी अर्जांऐवजी सीएमएमएस पोर्टल आणि एचएलबीसी ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचे तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा व नियम, आणि माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या ६४ फिल्ड ट्रेनर्सना हँड्स-ऑन ट्रेनिंग दिले जात आहे. हे प्रशिक्षित ट्रेनर्स पुढे २७ एप्रिल ते ८ मे २०२७ या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधिनस्त असलेल्या नऊ चार्जमधील सुमारे ४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज करणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रक्रियेत अचूकतेचे महत्त्व अधोरेखित केले असून डिजिटल सुविधेमुळे डेटा संकलनात पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या जनगणनेत नागरिकांसाठी प्रथमच 'स्व-गणना' म्हणजेच सेल्फ-इन््युमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी १ मे २०२७ ते १५ मे २०२७ या कालावधीत शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर लॉगीन करून स्वतःची माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर १६ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत घरयादी आणि घरगणनेचा पहिला टप्पा राबविला जाणार आहे. उपजिल्हाधिकारी रूपाली भालके यांच्या नियोजनाखाली जिल्ह्याचा कोणताही भाग या प्रक्रियेतून सुटू नये आणि माहितीचे संकलन विहित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule