
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल, (हिं.स.)। शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आता केवळ औपचारिकता राहिली नाही. तिचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाईचा इशारा दिला. ऑनलाइनशिवाय ११ वीमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये बसू देणार नाही, असा निर्णय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतला.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाने ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला. यामागे प्रवेश प्रक्रियेत होणारे गैरप्रकार, मनमानी प्रवेश रोखणे हा मुख्य उद्देश होता. मात्र, काही महाविद्यालयांनी या प्रक्रियेला बगल देत थेट ऑफलाइन प्रवेश देण्याचा मार्ग अवलंबल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासनाच्या धोरणालाच तडा जात असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.
ज्या विद्यार्थ्यांनी ११ वी मध्ये ऑनलाइन प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला आहे, त्यांनाच १२ वीमध्ये प्रवेश देण्यात यावा. अन्य कोणत्याही मागनि प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळ स्वीकारणार नाही. १२ वी परीक्षेसाठी अर्ज भरताना संबंधित ११ वी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ऑनलाइन प्रणाली बंधनकारक केली आहे. काही संस्थांकडून नियमभंग होत असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घ्यावा लागला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis