
नंदुरबार, 08 एप्रिल, (हिं.स.) कोळदा-शहादा-खेतिया राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामामुळे प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत
झाल्याने कामातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी कळविली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 जी वर डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असून 19
मार्च 2026 रोजी पुलाच्या 'रिटर्न वॉल'साठी खोदकाम करत असताना अचानक माती खचली. यामुळे प्रकाशा
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिकेचा पाईप फुटला आणि पाणीपुरवठा खंडित झाला होता. घटनेचे
गांभीर्य लक्षात घेऊन रस्ते विकास महामंडळाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेवून सर्व तांत्रिक तपासणी पूर्ण
करून पाणीपुरवठा त्वरीत पूर्ववत करण्यात आला आहे.
भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून संबंधित ठेकेदार कंपनीला (HG Infra Engineering Ltd.) अधिक
काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर
कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर