
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.) : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दैदिप्यमान इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ९ एप्रिल हा शौर्य दिन आज लातूर येथील सीआरपीएफ कँम्पमध्ये मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला.
९ एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानी सैन्याने गुजरातच्या कच्छ रणातील भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन डेजर्ट हॉक’ सुरू केले होते. यावेळी सीमेवरील ‘सरदार’ आणि ‘टाक’ या चौक्यांच्या रक्षणाची जबाबदारी सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनच्या जवानांवर होती. पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या एका बलाढ्य ब्रिगेडने अचानक हल्ला चढवला, मात्र संख्येने कमी असूनही सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत धाडसाने हा हल्ला परतावून लावला. सलग १२ तास चाललेल्या या ऐतिहासिक लढाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी लष्कराचे ३४ जवान टिपले. एका निमलष्करी दलाने लष्कराच्या मोठ्या तुकडीला रोखून धरण्याची ही जगाच्या लष्करी इतिहासातील दुर्मिळ कामगिरी ठरली.
याच शौर्याचे स्मरण म्हणून आज लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अमिरुल हसन अंसारी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या संबोधनात अंसारी यांनी जवानांच्या अतुलनीय धैर्याचा गौरव केला आणि उपस्थित सर्व जवानांना व त्यांच्या परिवाराला शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis