
लातूर, 16 मे, (हिं.स.)। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला अधिक सक्षम करण्यासाठी 'समृद्ध शेतकरी समृद्ध भारत अभियान ३.०' ही आपली लोकचळवळ आता अधिक व्यापक आणि परिणामकारक होत आहे. याच अभियानांतर्गत मौजे होसुर येथील श्री हनुमान मंदिरात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर पार पडले.
या शिबिरात कृषी तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी सोयाबीन, तूर आणि ऊस पिकांच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानासह, फळबाग लागवड आणि 'जलतारा' प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व यावर अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. बळीराजाला केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न ठेवता, त्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची भक्कम जोड देऊन मतदारसंघात कृषी विकासाचे एक मजबूत आणि शाश्वत मॉडेल उभारण्यासाठी दृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तानाजी बिरादार जी, तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी शेख सर, सहाय्यक कृषी अधिकारी सुहासिनीताई मुगळे, भालके सर यांच्यासह होसुर आणि परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis