
बीड, 17 मे (हिं.स.)। माजलगाव-तेलगाव हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. मोठमोठे खड्डे, तुटलेले डांबरीकरण, अपघातांची वाढती संख्या आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रास्ता रोको आंदोलन, निवेदने आणि आंदोलनाच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली होती.
अशा परिस्थितीत आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी पुढाकार घेत माजलगाव तेलगाव रस्त्यासाठी तब्बल ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निधीमुळे रस्त्याचे मजबुतीकरण, दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कामे होणार असल्याने हा निर्णय शेकडो नागरिकांचे जीव वाचवणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिक या रस्त्याचा वापर करतात.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis