
बीड, 17 मे (हिं.स.)।
माणसाचे समर्पण हे बहुधा संसारासाठी असते, मात्र परमार्थात काही मागण्यापूर्वी पूर्ण समर्पण असावे लागते. जगद्गुरू संत तुकोबारायांनी आपले संपूर्ण जीवन भगवंत भक्तीसाठी समर्पित केले होते, म्हणूनच त्यांनी देवाकडे मागताना केवळ भगवंत स्मरणाचे दान मागितले, असे प्रतिपादन हिंगोली येथील कीर्तनकार कान्होपात्रा शिंदे यांनी केले.
येथील स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. याप्रसंगी कान्होपात्रा शिंदे यांची किर्तनसेवा संपन्न झाली. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. कीर्तनसेवेसाठी कान्होपात्राताई शिंदे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 'हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा' या
मागणीपर अभंगाचे निरूपण केले. त्या म्हणाल्या, तुकोबारायांनी जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी देवाकडे धन-संपदा किंवा मुक्ती मागितली नाही, तर केवळ देवाचे नाव आणि संतसंगती मागितली. देवाच्या गुणांचे वर्णन करणे हीच भक्तासाठी मोठी कमाई असते.
संतांचे अवतार हे भगवंताच्या सोबतीनेच झालेले असतात, हा धागा पकडून या म्हणाल्या, प्रत्येक युगात संत देवासोबत होते. सत्ययुगात जेव्हा भगवंताने नरसिंह अवतार घेतला, तेव्हाही भक्त आणि संतांची मांदियाळी सोबत होती. संतांकडे निःस्वार्थ भावना असते. संत विचारातून मानवी जीवन समृद्ध होते, जीवनाची सार्थकता होते म्हणूनच संतांच्या विचारांचे स्मरण सातत्याने घडले पाहिजे असे प्रतिपातून त्यांनी यावेळी केले. या कीर्तनप्रसंगी बीड शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis