
पुणे, 17 मे (हिं.स.)।
महंमदवाडी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर नळजोडणी करून देण्याच्या नावाखाली काही ठिकाणी नागरिकांकडून अवाजवी रक्कम उकळली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क भरावे आणि अधिकृत परवानाधारक प्लंबरकडूनच नळजोडणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महंमदवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठ्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून दोराबजी पॅराडाईज परिसरात तीन नवीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्यांमधून सुमारे १२०० ते १५०० गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींना नियमित तसेच अधिक दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेला कमी दाबाने पाणी मिळण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.
सध्या या परिसराला रामटेकडी आणि बकरी हिल येथील पाण्याच्या टाक्यांमधून पुरवठा केला जातो. मात्र, जलवाहिन्यांच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोसायट्यांना अत्यल्प दाबाने पाणी मिळत होते. नव्या टाक्यांमुळे मुख्य जलवाहिन्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात आले असून, पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु