
परभणी, 18 मे (हिं.स.) : मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बळीराजा शेतकरी विकास पॅनलने सर्व १३ जागांवर विजय मिळवत संस्थेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
संस्थेच्या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात बळीराजा शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत सोसायटीवरील आपले वर्चस्व कायम राखले.
सर्वसाधारण कर्जदार प्रवर्गातून रामचंद्र ज्ञानोबा पठाडे, रतन वैजनाथ पठाडे, मदन सोपान पठाडे, ज्ञानेश्वर प्रल्हाद अवचार, माणिक पंढरीनाथ शेळके, इमरान खान मुस्तफा खान, अकबर खान रहीमदाद खान आणि असेफाबी मोहसीन खान पठाण हे उमेदवार विजयी झाले.
महिला प्रवर्गातून केशर निवृत्तीराव पठाडे आणि वृंदावनी बाळासाहेब पठाडे यांनी विजय मिळवला. ओबीसी राखीव प्रवर्गातून शिवाजी कुमार गुंगाणे, अनुसूचित जाती प्रवर्गातून शंकर शामराव पाईकराव, तर भटक्या जमाती प्रवर्गातून बाळू विठ्ठल गिरी हे उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून यू. एम. शेख यांनी काम पाहिले. निकालानंतर राजेश विटेकर, पंकजराव आंबेगावकर, गंगाधरराव कदम, नारायण भिसे, कुमार गुंगाणे, वैजनाथ पठाडे तसेच उमरखान पठाण यांनी पॅनल प्रमुख सचिन पठाडे आणि सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत करून अभिनंदन केले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis