
३४ जोडप्यांचा होणार विवाह; माजी खासदार इम्तियाज जलील प्रमुख राहणार पाहुणे
अमरावती, 18 मे (हिं.स.)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) अमरावती शाखा तसेच सुफियान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० मे रोजी अमरावती शहरात जिल्हास्तरीय इज्तेमाई निकाह अर्थात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी ६ वाजता सुकळी रोडवरील लालखडी परिसरातील अफ्फान हॉल तथा सुफियान हॉल येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इम्तियाज जलील उपस्थित राहणार असून, त्यांच्यासोबत एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसूफ पुंजानी तसेच प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या सामूहिक विवाह सोहळ्यात ३४ जोडप्यांचा निकाह लावण्यात येणार आहे. नवदाम्पत्यांना आयोजकांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू भेटस्वरूप देण्यात येणार असून, समाजातील गरजू कुटुंबांना आधार देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एमआयएमचे शहर उपाध्यक्ष मोहम्मद इक्बाल, महासचिव शहजाद खान, नासीर खान, सचिव हाजी अब्दुल वहीद तसेच मनपा गटनेते अब्दुल हमीद आणि पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी