मालेगावात घटसर्पामुळे दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू
22 वर्षांनंतर महापालिका क्षेत्रात रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क मालेगाव, 18 मे (हिं.स.)। शहरातील सायने बुद्रुक शिवारातील चाळीसगाव फाटा परिसरातील स्थलांतरित वस्तीमध्ये घटसर्प (डिप्थेरिया) या संसर्गजन्य आजाराने दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घ
मालेगावात घटसर्पामुळे दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू


22 वर्षांनंतर महापालिका क्षेत्रात रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

मालेगाव, 18 मे (हिं.स.)।

शहरातील सायने बुद्रुक शिवारातील चाळीसगाव फाटा परिसरातील स्थलांतरित वस्तीमध्ये घटसर्प (डिप्थेरिया) या संसर्गजन्य आजाराने दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काबील सुनील मदारी (वय 5) व सावंत सुनील मदारी (वय 1) अशी मृत बालकांची नावे आहेत. ती राजस्थान येथुन मालेगाव मध्ये आलं होते. 22 वर्षांनंतर महापालिका क्षेत्रात घटसर्पचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काबील मदारी याला दोन दिवसांपासून ताप होता. त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सायंकाळी मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या गळ्याला सूज आली होती, नाकातून रक्तस्राव होत होता तसेच झटकेही येत होते. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. गळ्यात पापुद्रा तयार झाल्याने श्वसननलिका टाकण्यात अडचणी येत होत्या. कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सर्वतोपरी उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.दरम्यान, काबीलचा धाकटा भाऊ सावंत मदारी (वय 1) याचाही अशाच लक्षणांमुळे मृत्यू झाला होता. दुसर्या भावाच्या मृत्यूनंतर हा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली.मदारी कुटुंब मूळचे राजस्थानातील अजमेर येथील आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते सायने बुद्रुक शिवारातील भटक्या वस्तीत वास्तव्यास आहेत. मजुरी व भीक मागून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब नागरी सुविधा व आरोग्यविषयक बाबींविषयी अनभिज्ञ असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

, आरोग्य विभागाने संबंधित परिसरात संशयित रुग्ण शोधमोहीम सुरू केली आहे. तातडीने लसीकरण अभियान हाती घेण्यात आले आहे. मृत बालकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आले आहेत. सात वर्षांखालील मुलांना पेंटाव्हॅलेंट व डीपीटी लस, तर मोठ्या मुलांना, पालकांना व तरुणांना टीडी लस देण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घटसर्प आजाराची लक्षणे

घटसर्प हा घसा व नाकातील श्लेष्मल त्वचेवर परिणाम करणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. संसर्ग झाल्यानंतर दोन ते पाच दिवसांत लक्षणे दिसू लागतात. घशात करड्या रंगाचा थर तयार होणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, मानेला सूज येणे, श्वास घेण्यास त्रास व ताप ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर अवस्थेत हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande