
अमरावती, 19 मे, (हिं.स.) - अमरावती शहरात नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक व दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या खोलापुरी गेट परिसरातील चार चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व. पायल पंडित, स्व. यश काकने, स्व. सोनाली जोशी व स्व. आदित्य जोशी या निष्पाप चिमुकल्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत वेदनादायी घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष तथा आमदार मा. श्री रविभाऊ राणा यांनी तत्काळ मृत बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दुःखी पालकांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. तसेच या दुःखाच्या प्रसंगी आपण व युवा स्वाभिमान पक्ष कायम पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.
आमदार रविभाऊ राणा यांनी स्व. पायल पंडित, स्व. यश काकने, स्व. सोनाली जोशी व स्व. आदित्य जोशी या चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना केली. या वेळी उपस्थित नागरिकांमध्येही मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरसेवक योगेश विजयकर, नगरसेविका अर्चना पांडे, नगरसेविका प्रियंका पाटने, राजा बांगडे, बबलु आठवले, अशोक पांडे, किशोर पिवाल, भुषण पाटने, राजेश अंबाडकर, दिलीप भाकरे, पंकज गायकवाड,सुरज बटोले, सोनु माकोडे, विलास पवार, चंदू गावंडे, अवि भुयार, व परीसरातील नागरीक उपस्थितीत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी