
नाशिक, 19 मे, (हिं.स.)राज्यातील विधान परिषदेच्या ज्या जागा गेल्यावेळी शिवसेनेने लढविल्या होत्या, त्या जागांवर यावेळीही शिंदेसेना दावा करणार आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे सेनेकडेच राहील. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील, असा दावा शिंदेसेनेचे नेते खा. श्रीकांत शिंदे यांनी केला.
खा. शिंदे यांनी काल नाशिक येथून संवाद यात्रेची सुरुवात केली. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, प्रत्येक गट आणि गणात पक्षाची काय स्थिती आहे, 'बीएलओ' नेमणूक प्रक्रियेची सद्यःस्थिती काय आहे, याची माहिती घेत संपूर्ण महाराष्ट्रात १.२५ लाख बीएलओ नेमले आहेत. २८८ विधानसभा मतदार संघांत पक्ष बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना
पूर्ण ताकदीनिशी उतणार असून, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत त्यांनी सांगितले की, सर्व कामे वरिष्ठ पातळीवरून समन्वय साधून पूर्ण केली जात आहेत. शिंदेसेनेला विश्वासात घेतले जात नाही या आरोपात तथ्य नाही. तसेच माजी खा. हेमंत गोडसे यांच्या नाराजीमुळे बैठकीस अनुपस्थित असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांच्याशी माझा संपर्क झाला असून, वैयक्तिक कामामुळे ते उपस्थित राहू शकले नाही, असा खुलासाही त्यांनी केल्याचे ते म्हणाले. महापालिका निवडणुकीत यश कमी मिळाले असले तरी लोकांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावरच असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून, ताफ्यातील गाड्या कमी करून काटकसरीचा नवा पायंडा पाडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV