
मुंबई, १९ मे, (हिं.स.) - पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने म्हटले आहे की, संघाची तयारी उत्तम सुरू असून सर्व क्रिकेटपटू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
भारतीय संघ या टी-20 विश्वचषकात १४ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यापूर्वी, संघाने बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये एका प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला असून यजमानांविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी २२ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे.
मुंबईत महिलांच्या स्वच्छता उत्पादनांच्या एका ब्रँडच्या कार्यक्रमादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मानधनाने सांगितले की, संघाने विश्वचषकाच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतली आहे, मात्र तिने रणनीतीबद्दल अधिक माहिती उघड करण्यास नकार दिला. ती म्हणाली, शिबिर खूप छान झाले. आम्ही विश्वचषकाची तयारी करत आहोत आणि त्याआधी एक मालिका खेळणार आहोत. सर्व क्रिकेटपटू चांगल्या शारीरिक स्थितीत आहेत आणि त्यांनी चांगला सराव केला आहे. आशा आहे की, आम्ही ही मेहनत अशीच सुरू ठेवू, देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू आणि ट्रॉफी घरी आणू.
कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, मंधानाने खेळातील करिअरच्या संधींवरही भर दिला. ती म्हणाली की, आजची मुले खेळांबद्दल आणि खेळाडूंच्या संघर्षाबद्दल खूप जागरूक आहेत. मानधना म्हणाली, खेळ आणि क्रिकेट हे एक उत्तम करिअर असू शकते, हे मुलांना पटवून देणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी नेहमी म्हणते, तुमच्या आवडीच्या गोष्टी करा आणि त्या प्रक्रियेचा आनंद घ्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे