
जळगाव , 02 मे (हिं.स.) भुसावळ येथील पापानगर या अत्यंत गजबजलेल्या वस्तीत काल रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. वाऱ्यामुळे आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात प्रचंड घबराट आणि खळबळ उडाली. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीत तीन घरांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पापानगर परिसरातील एका घराला अचानक आग लागली. तोपर्यंत परिसरात जोरदार वारा वाहत असल्याने आगीच्या ठिणग्या शेजारील घरांवर पडल्या. अवघ्या काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि आजूबाजूच्या इतर दोन घरांनाही आपल्या कचाट्यात घेतले. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट पाहून परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. दाट लोकवस्ती आणि गजबजलेला परिसर असल्याने सुरुवातीला मदतकार्यात काही अडथळे आले. मात्र, अग्निशमन दलाचे ३ ते ४ बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी तिन्ही घरांमधील संसारोपयोगी वस्तू जळाल्याची माहिती असून यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर