
नंदुरबार, 20 मे (हिं.स.) भारताला लाभलेला हस्तलिखितांचा आणि पारंपरिक ज्ञानाचा अनमोल वारसा भावी पिढ्यांसाठी जतन
करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने 'ज्ञानभारतम्' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून या
प्रकल्पांतर्गत देशभरात 'राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहीम' राबवली जात असून, जिल्ह्यातील सर्व
नागरिक, धार्मिक तसेच सामाजिक संस्था व न्यास यांना या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक
धर्मदाय आयुक्त आर.एस. कानडे यांनी केले आहे.
किमान 75 वर्षे जुन्या हस्तलिखितांचे होणार जतन
या देशव्यापी सर्वेक्षण मोहिमेमध्ये किमान 75 वर्षे जुने, कोणत्याही भाषेतील किंवा लिपीमधील
हस्तलिखित, जुन्या पोथ्या आणि ज्ञानवृद्धी करणाऱ्या दस्तऐवजांचे जतन, डिजिटायझेशन (Digitization)
आणि प्रसार करण्यात येणार आहे. सध्या हे ज्ञानभांडार जागोजागी विखुरलेल्या स्वरूपात असून, ते एकाच
ठिकाणी डिजिटल स्वरूपात संकलित करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र
शासनाचा मानस आहे.
मालकी हक्क मूळ मालकांकडेच सुरक्षित राहणार
या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या हस्तलिखितांची मालकी
संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. शासनाकडून केवळ या अमूल्य
वारशाचे डिजिटल संवर्धन केले जाईल, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय या राष्ट्रकार्यात पुढे
यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सहभागासाठी येथे संपर्क साधावा:
आपल्याकडे किंवा परिसरात अशी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास अधिक माहिती आणि नोंदणीसाठी
अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय.पहिला मजला, तरुण सागर अपार्टमेंट, जैन दादावाडीजवळ,
ता. जि. नंदुरबार - 425412 दूरध्वनी क्रमांक: 02564-230146, ई-मेल आयडी: supdtest.nb-
mh@gov.in या पत्त्यावर संपर्क साधावा.
आपल्या पूर्वजांचा हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ज्ञानवारसा नष्ट होऊ नये, यासाठी नंदुरबार
जिल्ह्यातील नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि संशोधकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा,
असेही कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर