
अकोला, १ जून (हिं.स.) : येत्या खरीप हंगामात अल-निनोच्या प्रभावामुळे कमी व असमान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.
बाजारातील महागडे सोयाबीन बियाणे न वापरता शेतकऱ्यांनी स्वतःकडील घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी करून त्यावर बीजप्रक्रिया करून वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे खर्चात बचत होऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यास मदत होऊ शकते.
सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा-सरी पद्धत (बीबीएफ) किंवा बेडवर टोकन पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य हवामान स्थिती पाहूनच पेरणीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे