
रायगड, 01 जून (हिं.स.)। नेरळ ग्रामपंचायतीची एप्रिल २०२६ महिन्यात होणे अपेक्षित असलेली ग्रामसभा अद्याप आयोजित करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत शिवसेना उपशहर प्रमुख तथा श्री राजेंद्रगुरूनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी पंचायत समिती कर्जतचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
संदीप उतेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेरळ ग्रामपंचायतीची दरवर्षी एप्रिल महिन्यात आर्थिक वर्षाच्या प्रारंभी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र मे महिना संपत आला तरी एप्रिल २०२६ मधील ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली नसल्याने ग्रामपंचायत कारभाराबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ग्रामसभा अद्याप का घेण्यात आली नाही, याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून लेखी खुलासा मागविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच या निवेदनाची प्रत ग्रामपंचायत नेरळचे प्रशासक तथा ग्रामविकास अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या तक्रारीमुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)