
रायगड, १ जून (हिं.स.) : ओम साई गणेश अपंग कल्याण संस्थेच्या वतीने संजय गांधी विभागाच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात सोमवारी कर्जत तहसील कार्यालयात आमदार आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात्मक निवेदनावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अमर साळोखे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात दिव्यांग आणि लाभार्थ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात हयातीचे फॉर्म विनाशुल्क ऑनलाइन उपलब्ध करून देणे, बंद झालेल्या पेन्शन योजना तात्काळ सुरू करणे, नवीन प्रकरणांच्या मंजुरीची प्रक्रिया तहसीलदार स्तरावर ठेवणे तसेच कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अनिल बबन पाटील यांच्याकडे संजय गांधी विभागाचे संपूर्ण कामकाज सोपविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संजय गांधी विभागाशी संबंधित लाभार्थ्यांच्या विविध तक्रारी प्रशासनाने गांभीर्याने ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव पकेश भोईर यांच्यासह धनाजी हाडप, गणेश मुढे, रमेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बंदे, परशुराम घरत, रामदास पाटील, पत्रकार सतीश पाटील, सचिन वायले, यादव धारणे, अर्जुन लाड, महेंद्र गोमारे, महेंद्र व्हेशीकर, सुरेखा जाधव आणि अनेक दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)