इयत्ता १० वी, १२ वी पुरवणी परीक्षा; ५८१९ विद्यार्थ्यांसाठी २४ केंद्रांवर सज्जता
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)। इयत्ता १० वी व १२ वी म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा १६ जून ते ८ जुलै
अ


छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)।

इयत्ता १० वी व १२ वी म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज पार पडली.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, सर्व गटशिक्षणाधिकारी, पोलीस दलाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. ह्या दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात इयत्ता १० वीचे २९२८ विद्यार्थी हे १४ केंद्रांवर तर इयत्ता १२ वी चे २८९१ विद्यार्थी १० परीक्षा केंद्रांवर आपली परीक्षा देतील. इयत्ता १० वी ची परीक्षा ही दि.१६ ते ३० जून दरम्यान होणार आहे तर इयत्ता १२ वी ची परीक्षा दि.१६ जून ते ८ जुलै दरम्यान होणार आहे.

विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठीही प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. शिवाय झूम यंत्रणेद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील हालचालींवर मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. भरारी पथके सज्ज करण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांना पुर्वतयारीसाठी सराव सत्रे घेण्यात आली आहेत. तसेच मानसिक समुपदेशनही करण्यात आले आहे. या शिवाय परीक्षा केंद्रा बाहेर पोलीस बंदोबस्त आदी सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याचेही श्रीमती लाठकर यांनी बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठीही सगळ्यांनी सज्ज रहावे,असे निर्देश त्यांनी दिले. तसेच परीक्षेसाठी जिल्हाधिकारी गौडा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande