

- भारतीय शूटिंगचा आधारस्तंभ हरपला
नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.)। भारतीय निशानेबाजीला मोठा धक्का बसला असून दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील साकेत येथील खासगी रुग्णालयात निधन झाले ते 49 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच जर्मनीतील म्यूनिख येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतून भारतीय पथकासोबत परतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर हृदयविकाराशी संबंधित उपचार सुरू होते आणि त्यांना स्टेंटही बसविण्यात आला होता.
जसपाल राणा सध्या भारताच्या पिस्टल निशानेबाजी संघाचे उच्च कार्यप्रदर्शन प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने भारतीय खेळविश्वात, विशेषतः शूटिंग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. खेळाडू म्हणून तसेच प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशाच्या निशानेबाजीला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात 28 जून 1976 रोजी जन्मलेल्या राणा यांनी लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. 1994 च्या हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारतीय शूटिंगचा झेंडा उंचावला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात भारतातील सर्वाधिक यशस्वी खेळाडूंमध्ये त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. चार आवृत्त्यांत त्यांनी 15 पदके पटकावली, ज्यात 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे.
खेळातून निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनु भाकर, सौरभ चौधरी, अनीश भानवाला आणि चिंकी यादव यांसारखे अनेक गुणवंत नेमबाज घडले. मनु भाकरने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला, त्यात राणा यांचा मोलाचा वाटा मानला जातो.
भारतीय क्रीडाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना 2020 मध्ये प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनेही त्यांचा गौरव झाला होता. जसपाल राणा यांच्या जाण्याने भारतीय शूटिंगचा एक तेजस्वी अध्याय संपल्याची भावना क्रीडा वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, उत्तराखंडचे सुपुत्र, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि भारतीय नेमबाजी विश्वाचा अभिमान असलेले जसपाल राणा यांचे आकस्मिक निधन अत्यंत दुःखद आहे. नेमबाजी क्षेत्रातील त्यांचे असाधारण योगदान, ऐतिहासिक कामगिरी आणि तरुण खेळाडूंना दिलेली प्रेरणा यांनी भारताला जागतिक स्तरावर अभिमान मिळवून दिला. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील. त्यांचे निधन हे क्रीडा जगतासाठी, उत्तराखंडसाठी आणि संपूर्ण देशासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule