
पुणे, 12 जून (हिं.स.)।
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. लक्ष्यांकित उद्दिष्टांची शंभर टक्के पूर्तता करण्यासाठी विभागाने काटेकोर नियोजन केले असून, सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
घटसर्प (एचएस) आणि फऱ्या (बीक्यू) यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रणासाठी लसींची शीतसाखळी व्यवस्थापन व्यवस्था सक्षम करण्यात आली असून, जिल्हा व तालुका स्तरावर पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके गावागावांत जाऊन 'डोअर स्टेप' पद्धतीने लसीकरण करीत आहेत.
पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पशुपालकांनी गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु