जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास व कॉरिडॉरची गरज : डॉ. गोऱ्हे
जेजुरी, 14 जून (हिं.स.)। जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी आपण अनेकदा विधानभवनात बैठका घेतल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
Jejuri


जेजुरी, 14 जून (हिं.स.)। जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी आपण अनेकदा विधानभवनात बैठका घेतल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

जेजुरी येथे डॉ. गोऱ्हे यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. खंडोबाने जसा दुष्ट शक्तींचा पराभव केला, तसेच सर्व नागरिकांना संकटांपासून संरक्षण मिळावे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण होत राहावीत, अशी प्रार्थना त्यांनी श्री खंडोबाच्या चरणी केली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त ऍड. विश्वास पानसे यांनी डॉ. गोऱ्हे यांना शाल, श्रीफळ व खंडोबाची प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच कोविड काळात घडशी समाजाला केलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्या वतीनेही डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकारांसोबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, जेजुरीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. धर्म आणि परंपरा यांचा आदर राखत समाजसुधारणा करता येते, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम केले. अनेकदा धर्म सोडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असे म्हटले जाते; मात्र धर्मातील योग्य सुधारणा करूनही समाजाची प्रगती साधता येते. यासाठी सर्व समाजघटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सेंद्रिय हळदीचा वापर वाढविण्यासाठी देवस्थानने पुढाकार घ्यावा आणि भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार करावा, असे त्यांनी सुचविले. राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असेही त्यांनी सांगितले.

रासायनिक व बनावट हळदीमुळे भाविकांच्या त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मंदिराच्या ऐतिहासिक दगडी वास्तूलाही त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शुद्ध आणि सेंद्रिय हळदीचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी श्री मार्तंड देवसंस्थानला त्यांनी वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिली.

देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी जेजुरीच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जेजुरीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधा असलेले भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्येही धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र अशा विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande