
पिंपरी, 17 जून (हिं.स.)। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व आवश्यक सुविधा नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन,सुरक्षा व्यवस्था,स्वच्छता,आरोग्य सुविधा,आपत्कालीन सेवा तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. पालखी मार्गावर येणाऱ्या वारकरी भाविकांना सुरक्षित,स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे,अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. आषाढी वारी पालखी सोहळा हा राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. त्यामुळे पालखी मार्गावरील सर्व यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
यावेळी पालखी मार्गावरील वाहतूक नियोजन,आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना,स्वच्छता व्यवस्थापन,आरोग्य सेवांची उपलब्धता तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळा सुरक्षित,शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला महापौर रवि लांडगे,आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे,विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांच्यासह महावितरण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु