
छत्रपती संभाजीनगर, 18 जून, (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यात दूध भेसळी विरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे दूध उत्पादक शेतकरी आनंदी आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली.भेसळयुक्त दुधाला आळा घातल्यामुळे बाजारातील भेसळयुक्त दूध कमी होऊन शुध्द दुधाची मागणी वाढेल आणि त्याचा थेट फायदा शेतकर्यांना होईल. परिणामी शेतकर्यांना त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईचे शेतकर्यांनी ठिकठिकाणी स्वागत केले असून अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकर्यांनी तर मुंढे यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. तुकाराम मुंढे यांची आता किमान तीन वर्ष या पदावरून बदली करू नये अशी मागणी देखील शेतकर्यांमधून होत आहे.
खरं तर दूध भेसळीच्या विळख्यात अडकलेल्या व्यवस्थेमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकरी भरडला गेला. जनावरांचे पालनपोषण, चारा, औषधे, मेहनत आणि कर्जाचा डोंगर पेलत शेतकरी शुध्द दूध तयार करतो, पण भेसळखोरांच्या काळ्या धंद्यामुळे त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या दूध भेसळी विरोधातील धडक मोहिमेमुळे पहिल्यांदाच अनेक शेतकर्यांना वाटू लागले आहे की, शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे. दूध भेसळ रोखण्याची मोहिम ही केवळ प्रशासकीय कारवाई नाही, तर ती शेतकर्यांच्या घामाला न्याय देणारी लढाई आहे.
शेतकर्यांच्या भावना व त्यांच्या घामाचा सन्मान करायचा असेल तर तुकाराम मुंढे यांची किमान तीन वर्ष या पदावरून बदली न करता त्यांनी हाती घेतलेल्या मोहिमेला आपण पाठबळ द्यावे ही नम्र विनंती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis