
रायगड, 18 जून (हिं.स.) : अलिबाग : बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महिला व बालकल्याण सभापती रसीका केणी यांनी दिला आहे. अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण, पोषण, शिक्षण आणि आरोग्य यासाठी शासन विविध योजना राबवत असते. मात्र काही ठिकाणी या योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बालकांच्या विकासासाठी राखीव असलेला निधी आणि सुविधा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत कोणताही अपहार किंवा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी कडक नियंत्रण ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
संबंधित विभागांनी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रभावी देखरेख ठेवावी, नियमित तपासण्या कराव्यात आणि तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, असे निर्देशही रसीका केणी यांनी दिले.
बालकांच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. योजनांमध्ये पारदर्शकता वाढवून लाभार्थ्यांचा विश्वास कायम राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच समाजातील नागरिकांनीही सतर्क राहून गैरप्रकारांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)