
सोलापूर, 18 जून (हिं.स.)।सुमारे १२५ वर्षांपासून दुमजली चाळींमध्ये राहणाऱ्या सोलापूरमधील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित मिळकतींवरील ‘बी-२’ निर्बंध हटवून नागरिकांना काही हजार रुपयांत मालकी हक्क देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अंतिम टप्प्यात आहे.या निर्णयाचा लाभ सोलापूर शहरातील ८२५ मिळकतींमधील सुमारे सहा हजार कुटुंबांना होणार आहे. या संदर्भातील फाइल सध्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असून, येत्या महिनाभरात शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
सोलापूरमध्ये एनजी मिल चाळ, जुनी मिल, वारद, लक्ष्मी-विष्णू, काडादी, पाटील चाळ, क्लार्क चाळ यांसह एकूण १४ चाळी आहेत. याशिवाय जुनी पोलिस लाईन, मोदी आणि सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांनाही स्वतःच्या घराचा मालकी हक्क मिळालेला नाही.स्वातंत्र्यपूर्व काळात नागरिकांनी खरेदीखताद्वारे या जागा विकत घेऊन दुमजली चाळी उभारल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्यानंतर या जागा सरकारी मालकीच्या समजून त्यांच्यावर विविध निर्बंध लादण्यात आले.दरम्यान, नागपूरमधील सिंधी समाजाला दिलेल्या सवलतीच्या धर्तीवर सोलापूरमधील चाळींतील रहिवाशांनाही दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या विषयाचा सातत्याने पाठपुरावा आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांकडे केला होता. विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच त्यांनी संबंधित मंत्र्यांच्या अनेक भेटी घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड