
जळगाव, 18 जून (हिं.स.)जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी जळगाव जिल्ह्यात मान्सूनने अद्याप हजेरी लावलेली नाही. एकीकडे पावसाने मोठी दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे जळगावकरांची असह्य उकाड्यापासून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट, हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत उष्णतेसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात उष्णतेचा इशारा मिळाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या १९ जून रोजी देखील तापमानासह उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. या दोन्ही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. खरंतर सर्वसाधारणपणे जून महिन्यात अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पाऊस पडतो. मात्र, यंदा या वाऱ्यांऐवी राजस्थानकडून येणारे अत्यंत उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. यामुळेच जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. जरी तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत दाखवला जात असला, तरी वातावरणातील अति आर्द्रतेमुळे नागरिकांना प्रत्यक्ष जाणवणारे म्हणजेच ‘फील लाईक’ तापमान तब्बल ४५ ते ४६ अंशांच्या आसपास राहू शकते.यंदा जळगाव जिल्ह्यात पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक असून जून अर्धा संपूनही पावसाने पाठ फिरवली आहे. १ ते १७ जून या कालावधीत जिल्ह्यात केवळ ९ मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यातील ५ मिमी पाऊस हा एकट्या ३ जून रोजी पडला होता. उर्वरित १६ दिवसांत अवघा ४ मिमी नावालाच पाऊस झाला आहे. आगामी ३ ते ४ दिवस तरी जिल्ह्यात दमदार पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर