
परभणी, 19 जून (हिं.स.)।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणीकरण ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास लाभार्थी शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचीत राहू शकतात. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याचे वर्षाला १२ हजार रुपये मिळतात. केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
राज्य शासनानेही तीन वर्षापूर्वी 'नमो' शेतकरी सन्मान योजना घोषित केली. प्रधानमंत्री सन्मान योजनेत पात्र शेतकरीच राज्याकडूनही लाभ घेतात. राज्य शासनाकडूनही वर्षाला सहा हजार रुपये मिळतात.
पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांनी 'अॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण करून युनिक फार्मर आयडी मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. जी पीएम किसान योजना, पीक विमा, अनुदान, कर्जमाफी आणि थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या कृषि लाभांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे.
राज्य आणि केंद्राच्या या योजनेसाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळत नाही. जिल्हयात आधार कार्ड प्रमाणीकरण आणि ई-केवायसी न करणारे हजारो शेतकरी आहेत. विशेषतः या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरण आणि ई-केवायसी दि. ३० जून २०२६ पुर्वी करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत सुदाम चव्हाण यांनी केले आहे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीसाठी सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis