
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तुर व उडीद पिकांच्या बिजोत्पादन कार्यक्रमाची अंमलबजावणी महाबीजमार्फत करण्यात येणार असून,या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. अभियानांतर्गत तुर व उडीद या प्रमुख कडधान्य पिकांच्या उत्पादनवाढीवर विशेष भर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये तुर पिकासाठी ‘गोदावरी’ जातीचे ३० हेक्टर, ‘रेणुका’ जातीचे ५० हेक्टर,तर उडीद पिकासाठी ‘फुले वसु’ जातीचे २५ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे.
सदर बिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाबीज, धाराशिव कार्यालयाशी संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन.जी.इनामदार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis