
नाशिक, 19 जून (हिं.स.)।
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार २१ जून २०२६ रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सव्वापाच या कालावधीत नीट यूजी २०२६ ही पुर्नपरीक्षा होणार आहे. ही परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे (प्रशासन) यांच्यासह परीक्षा एजन्सीचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, नीट यूजी परीक्षा अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा संवेदनशील व महत्वाची आहे. या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे. या परीक्षेसाठी उपकेंद्रनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचा आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV