नाशिक - पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्ह्यात १८२ टँकरद्वारे ३.२३ लाख नागरिकांना पाणीपुरवठा नाशिक, 19 जून, (हिं.स.)। जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत व्या
District administration


जिल्ह्यात १८२ टँकरद्वारे ३.२३ लाख नागरिकांना पाणीपुरवठा

नाशिक, 19 जून, (हिं.स.)। जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. १८ जून २०२६ रोजीच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील १७६ गावे व ४८३ वाड्यांमधील एकूण ३ लाख २३ हजार ७७१ नागरिकांना १८२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने विविध पर्यायी स्रोत कार्यान्वित केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सध्या १८२ टँकरच्या ३८२ फेऱ्या दररोज करण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी गावांसाठी 22 व टँकरसाठी 55 अशा एकूण 77 विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी विंधन विहिरी व अन्य जलस्रोतांचाही वापर करण्यात येत आहे.

येवला तालुक्यात 44 टँकर कार्यरत असून त्या माध्यमातून 44 गावे व 70 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात 38 गावे व 192 वाड्यांसाठी 36 टँकर, इगतपुरी तालुक्यात 8 गावे व 42 वाड्यांसाठी 21 टँकर, सिन्नर तालुक्यात 8 गावे व 71 वाड्यांसाठी 18 टँकर आणि सुरगाणा तालुक्यात 15 गावे व 14 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत.

मालेगाव तालुक्यात 17 गावे व 48 वाड्यांसाठी 17 टँकर, चांदवड तालुक्यात 14 गावे व 8 वाड्यांसाठी 11 टँकर, देवळा तालुक्यात 6 गावे व 10 वाड्यांसाठी 6 टँकर, बागलाण तालुक्यात 2 गावे व 6 वाड्यांसाठी 5 टँकर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात 4 गावे व 16 वाड्यांसाठी 6 टँकर, पेठ तालुक्यात 6 गावे व 6 वाड्यांसाठी 6 टँकर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. ज्या भागांमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे, तेथे अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याबरोबरच नव्या जलस्रोतांचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि संबंधित महसूल यंत्रणा यांच्यात समन्वय साधून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून आगामी काळात आवश्यकतेनुसार विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून त्याचे नियोजन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहेत.

एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी 31 ऑगस्ट अखेर वापरायचे आहे. सर्व धरण समूहात सरासरी एकूण 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याचे पाणी सोडून इतर सिंचन आर्वतन थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. धरण क्षेत्रातून अनधिकृत पाणी उपसा होत असेल तर प्रतिबंधासाठी पथके नियुक्त करून फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande