

गडचिरोली, 19 जून (हिं.स.)।
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरणालाही चालना मिळाली आहे. आगामी काळात संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे कमी पर्जन्यमान किंवा पाणीटंचाईसारखी आव्हाने निर्माण झाल्यास त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी ही जलसंधारणाची कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६,०१५ जलसंधारण कामे पूर्ण झाली असून त्यातून १८,७५० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. तसेच प्रगतिपथावरील कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी २,०६० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण होणार आहे.
पूर्ण झालेल्या कामांमध्ये १,३२९ बोडी खोलीकरण, ७६७ फळबाग लागवड, १,०६४ शेततळे, ३२३ गॅबियन बंधारे, ३८७ रिचार्ज शाफ्ट, २०७ कोल्हापुरी बंधारे तसेच वनक्षेत्रातील वनराई बंधारे, वनतळे आणि एलबीएससारख्या विविध मृद व जलसंधारण कामांचा समावेश आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे अधिकाधिक संधारण होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ४,६३८ कामे पूर्ण झाली असून त्यातून ९,३४० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. या योजनेत बोरी खोलीकरण, शेततळे, मजगी, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, रिचार्ज शाफ्ट, सिमेंट नाला बंधारे आणि तलाव दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत १,०४२ कामे प्रस्तावित असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेततळे, मजगी, गॅबियन बंधारे, डीप सीसीटी आणि एलबीएसची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमधून ५,२०० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.
याशिवाय जिल्हा खनिज निधी, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना यांमधूनही जलसंधारणाची महत्त्वपूर्ण कामे राबविण्यात आली आहेत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून जलसाठा क्षमता वाढविण्यात यश आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ५,३१९ टीसीएम, तर आदिवासी उपयोजनेतील कामांमधून १,८१८ टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, हवामानातील बदल आणि संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसुरक्षा अधिक महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांमधून निर्माण झालेली जलसाठा क्षमता आणि भूजल पुनर्भरणाची व्यवस्था ही भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रलंबित जलसंधारण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
जिल्ह्यात उभारण्यात आलेली ही व्यापक जलसंधारण यंत्रणा केवळ पावसाचे पाणी साठविण्यासाठीच नव्हे तर भूजल पातळी वाढविणे, सिंचनक्षमता मजबूत करणे आणि ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याची ही जलसंधारणातील गुंतवणूक भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी भक्कम आधार ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond