
सत्ताधारी नगरसेवक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप, आमदारांवरही गंभीर आरोप
मनमाड, 02 जून (हिं.स.)। शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावरील अतिक्रमण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग, मनमाड नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून हटवण्यात आले. मात्र, या कारवाईत प्रशासनाने मोठा दुजाभाव केल्याचा आरोप होत असून, यामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. महामार्गावरील गरिबांची दुकाने हटवण्यात आली असली, तरी शहरातील अनेक मुख्य भागांतील अतिक्रमणे अद्यापही 'जैसे थे' आहेत.मुख्य बस स्थानकाबाहेर टॅक्सी युनियनचे ऑफिस आहे त्याला आमदार सुहास कांदे यांनी निधी दिला म्हणून ते हटवले नाही का ..? असा संतप्त सवाल शिंदे गटातीलच नगरसेवक व स्थानिकानी उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून धनदांडग्यांना पाठीशी घातल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्ग असलेले तसेच शहरातील वाहतुकीला अडथळा होणारे सर्वच 630 पेक्षा जास्त अतिक्रमण काढण्याच काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग, मनमाड नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून काढण्यात आले या धडक कारवाईदरम्यान काही रस्ते मोकळे झाले असले, तरी अनेक नगरसेवकांचे नातेवाईक आणि नगराध्यक्षांच्या मित्रांची अतिक्रमणे जाणीवपूर्वक सोडून देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. प्रशासनाच्या या पक्षपाती भूमिकेवर खुद्द सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही नगरसेवकांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन केवळ गरिबांवर कारवाई करते , धनदांडग्यांवर नाही, असा सूर उमटत असून सामान्य नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याशी चर्चा केली असता शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमण पक्के बांधकाम करण्यात आले आहे त्यांच्या सर्वाच्या परवानगी बघुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल नियम सर्वाना सारखेच असतील यात दुजाभाव केला जाणार नाही असे मत व्यक्त केले.तर काल आणि आज अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी यांना अनेक नगरसेवक व स्वयंघोषित लोकनेत्यानी फोन केले मात्र मुख्याधिकारी यांनी कुणालाही न जुमानता अतिक्रमण काढून टाकले शहरातील उर्वरित भागांतील आणि प्रभावशली व्यक्तींची अतिक्रमणे प्रशासन कधी हटवणार, की ही मोहीम केवळ गरिबांचे नुकसान करण्यापुरतीच मर्यादित राहणार, असा संतप्त सवाल आता मनमाडकर विचारत आहेत.
पोलीस चौकी हटवली, पण आमदारांच्या वरदहस्तामुळे टॅक्सी कार्यालय सुरक्षित?
या मोहिमेत वाहतुकीला अडथळा ठरणारी स्वतःची वाहतूक पोलीस चौकी देखील पोलीस निरीक्षक विजय करे यांनी धडक निर्णय घेत हटवून घेतली. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे बस स्थानक परिसरातील टॅक्सी चालकांच्या कार्यालयावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी या कार्यालयासाठी निधी दिला असल्यानेच प्रशासनाने त्याला हात लावला नसल्याचा थेट आरोप आता नागरिक करत आहेत. सत्ताधारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून केवळ गोरगरिबांना टार्गेट करत असून वजनदार लोकांना पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नांदगांव महामार्गवरील अतिक्रमण धारकांना नोटीस नाही..!
मनमाड शहरातून दोन महामार्ग जातात एक इंदुर पुणे तर दुसरा नाशिक जळगाव यातील इंदुर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग आता चौपदरी होणार आहे. त्यासाठी अतिक्रमण काढणे बंधनकारक होतेच मात्र नांदगांव व चांदवड महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. मात्र नांदगांव रोडवरील अतिक्रमण धारकांना अद्याप नोटीस बजावली नसली तरी त्यांचे अतिक्रमण काढनार असल्याने या भागांतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV