
रायगड, 24 जून (हिं.स.) : मुरुड गावात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने सांडपाणी साचत असून कचऱ्याचे ढीगही अनेक ठिकाणी दिसून येत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छता अभियानासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मुरुड ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेची कामे अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील विविध प्रभागांमध्ये नाल्या तुंबलेल्या असून कचरा व्यवस्थापनाचा अभाव स्पष्ट दिसत आहे. परिणामी पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यांवर साचत असून नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः दत्तनगर परिसरातील छत्रपती शंभूराजे चौक ते क्रीडा संकुल आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गालगत मोठ्या प्रमाणात घाण साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात अशा अस्वच्छ परिस्थितीमुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने तातडीने नाल्यांची साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन या प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे आता संपूर्ण मुरुड गावाचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)