
नांदेड, 25 जून (हिं.स.)।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जुलै कालावधीतील २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच वितरीत करण्यात आला.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्यात प्रती वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत
जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापुर्वी एकूण २२ हप्त्यांमध्ये सुमारे १८०७.४१ कोटी रुपयांचा लाभजमा झालेला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थाने भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बैंक खाते आधार संलग्न करणे, व ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. जिल्ह्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण ३ लाख ८२ हजार ६६० शेतकरी कुटुंबांना दि. २० जून रोजी सुमारे रक्कम रुपये ७६.५३ कोटी रुपये इतक्या रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा झाला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis