
अमरावती, 25 जून (हिं.स.)।
तीव्र उष्णता, दमटपणा आणि मान्सूनच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, बुधवारी सायंकाळी वातावरणात बदल झाला आणि दाणादाण उडाली. मान्सूनच्या पहिल्याच दणक्यात संपूर्ण शहरात दाणादाण उडाली असून अर्धेधिक शहरामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. बरसलेल्या मुसळधार पावसामुळे महानगरपालिकेच्या निचरा व्यवस्थेच्या दाव्यांची पोलखोल झाली. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली आल्याने वाहनचालकांना रस्ता शोधण्यासाठी मोठी कसरतकरावीलागली. दुचाकीस्वार आणि पादचारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसले.
रोड रस्ते, मार्केटच नव्हेतर अनेकांच्या घरात सुद्धा नाल्या चोक अप झाल्यामुळे घाणीसह पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची मोठी धावपळ झाली. विलासनगर येथील गल्ली नंबर दोन, श्रीकृष्ण नगर, खत्री मार्केट पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, मालवीय चौक परीसरीतील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे साहित्य ओले झाले. या घरातील लोकांना पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. महापालिका प्रशासनाने नाल्याची साफसफाई व्यवस्थीत न केल्यामुळे सर्व नाल्या चोकअप झाल्याने आणि पहिल्याच पावसात आमच्या घरात पाणी शिरले, असा आरोप यावेळी करीत नागरीकांनी मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.धुव्वाधार झालेल्या पावसामुळे शहरातील अंबा नाला, दस्तुरनगर, काँग्रेस नगर रोड नाला, प्रशांत नगरातील नाल्यासह 16 मोठे नाले ओव्हर फ्लो होवून वाहत होते. छोटे 22 नाले सुद्धा तुडुंब भरले होते. या नाल्यात केरकचरा आणि गाळ साचला असल्यामुळे या पहिल्याच पावसात महापालिकेचे पूर्णतः पितळ उघडे पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी