
लातूर, 25 जून, (हिं.स.)। प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून भारतीय रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर एक्सप्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बिदर एक्सप्रेस या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार दोन्ही एक्सप्रेसमध्ये प्रत्येकी १ द्वितीय वातानुकूलित (2AC), १ तृतीय वातानुकूलित (3AC) आणि १ शयनयान (Sleeper) डबा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता या गाड्या २४ डब्यांसह धावणार असून प्रवाशांना अधिक जागा आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयामुळे विशेषतः लातूर आणि बिदर मार्गावरील नियमित प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार असून प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाही फायदा होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis