
पुणे, 25 जून (हिं.स.)।पुढील काही महिन्यांत पावसाचा अंदाज समाधानकारक नसल्याने शहरात पाणीकपात करणे अपरिहार्य असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी स्पष्ट केले. महापालिकेच्या मुख्यसभेत दिवसाआड पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाची भूमिका आयुक्तांनी स्पष्ट केली.
आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ ३.८८ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीकपातीपूर्वी शहराला दरमहा सुमारे १.६० टीएमसी पाणी लागायचे, तर कपातीनंतर ही गरज १.२० टीएमसीपर्यंत कमी झाली आहे. सध्याचा साठा लक्षात घेता पुढील तीन महिने शहराला पाणीपुरवठा करता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.परिस्थिती २०१५ प्रमाणेच राहिल्यास आगामी वर्षाच्या पाणी नियोजनावर आतापासूनच विचार करण्याची गरज असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. दरम्यान, दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे जलवाहिन्यांमध्ये हवेची पोकळी निर्माण होत असून काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु